जगातील सर्वांत उंचीवर असलेला चिनाब रेल्वे पूल बांधण्यासाठी अनेक आव्हानांचा सामना 'अफकॉन इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनी 'ला करावा लागला. तीव्र चढ-उताराच्या मार्गावरून प्रत्यक्ष साइटवर काम करण्यामध्ये अनेक अडचणी होत्या. मात्र, या संपूर्ण प्रकल्पात सामानाच्या वाहतुकीसाठी महत्त्वाची भूमिका बजावली ती घोडे आणि खेचरांनी.
आफकॉन इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या पुलाचे बांधकाम करणाऱ्या कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, सुरुवातीच्या आणि मुख्य अडचणांपैकी एक म्हणजे पुलाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी उपकरणे आणि बांधकाम साहित्य वाहून नेण्याची सोय करणे होती. "प्रकल्प पथकाने सुरुवातीला त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी खेचर आणि घोड्यांचा वापर केला. हळूहळू कालांतराने तात्पुरते रस्ते तयार करण्यात आले आणि त्या ठिकाणी प्रवेशाची सुविधा उपलब्ध झाली," असे कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या पुलाचे उद्घाटन झाले. उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला या मार्गावरील हा एक महत्त्वाचा पूल मानला जात आहे.
कंपनीच्या प्रवक्त्याने पुढे सांगितले की, प्रकल्पाच्या अखेरीस नदीच्या उत्तर किनाऱ्यावर ११ किमी लांबीचा रस्ता आणि दक्षिण किनाऱ्यावर १२ किमी लांबीचा रस्ता बांधण्यात आला. आफकॉनचे कार्यकारी उपाध्यक्ष कृष्णमूर्ती सुब्रमणियन यांनी सांगितले की, चिनाव रेल्वे पूल केवळ अभियांत्रिकीचा चमत्कार नाही. तो भारताच्या कल्पकतेने आणि चयनि सर्वांत कठीण आव्हानांवर मात करण्याच्या निर्धाराचे प्रतीक आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी कंपनीने जगातील सर्वांत उंच क्रॉसवार केवल क्रेन्स आणि विशेष जड यंत्रसामग्रीचा वापर केला. "चढ-उताराच्या भूमीवर मोठ्या प्रमाणावर ग्राउटिंग करून त्यांना विशाल कमानीच्या पाया निर्माण करण्यासाठी मजबूत बनवण्यात आले. अनेक वर्षे त्यासाठी मेहनत घेण्यात आली.
भारतीय रेल्वेच्या इतिहासात प्रथमच चिनाब पूलाची बांधणी करताना रुळाचा वळणावरील वक्र भाग वाढवित नेणे आणि चढही वाढविणे एकाच बिंदूपासून सुरू केले गेले आहे, असे 'अफकॉन' चे उपव्यवस्थापकीय संचालक गिरीधर राजगोपालन यांनी सांगितले. अफॉनचे व्यवस्थापकीय संचालक एस. परमेसिवन म्हणाले, "कंपनीसाठी हा पूल देशाच्या निर्मितीप्रती आमची अवाचित बांधिलकी आणि अत्यंत कठीण भूभागातही पायाभूत सुविधा घडवण्याची आमची क्षमता दर्शवतो.
आकर्षणाचा केंद्रबिंद
जम्मू-काश्मीरमधील चिनाब नदीवर उभारलेला जगातील सर्वात उंच रेल्वे पूल श्रीनगरकडे जाणाऱ्या विमान प्रवाशांमध्ये आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. या रेल्वेमार्गाच्या भागातून विमान जाताना वैमानिक याबाबत विशेष घोषणा करीत आहेत. त्यानंतर विमानातील प्रवासी पुलाचे छायाचित्र घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. याबाबत भारतीय रेल्वे बोर्डाच्या माहिती व प्रसिद्धी विभागाचे कार्यकारी संचालक दिलीपकुमार म्हणाले, "चिनाब पूल विमानातूनही लक्ष वेधून घेत आहे. या पुलाच्या निर्मितीचा अभिमान वाटत आहे."