नवा कर्णधार, नवी विचारसरणी आणि नव्याने संघ बांधणी अशा संक्रमणाच्या स्थितीत असलेल्या भारतीय कसोटी संघाचे नवे पर्व उद्यापासून सुरू होत आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघासमोर आव्हाने मोठी असली तरी लढण्याचा आशावाद भक्कम आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या निवृत्तीनंतर भारताची फलंदाजी कसा तग धरणार किंवा यातून कसा मार्ग काढणार,याची उत्सुकता वाढली आहे.
कधी नव्हे ते लीड्स शहराचे हवामान चांगलेच गरम आहे. सूर्यमहाराज पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिले दोन दिवस राज्य करणार आहेत. हेडिंग्ले मैदानाची खेळपट्टी काहीशी हिरवी गवताची झाक बाळगून असली तरी हवामानाचा विचार करता नाणेफेक जिंकणाऱ्या कप्तानाला पहिली फलंदाजी करायचा मोह पडेल, असे वाटते आहे. सामना चालू होण्याअगोदर भारताचे गोलंदाज आक्रमक इंग्लिश फलंदाजीला कसे जाळ्यात सापडवणार, हीच चर्चा रंग भरते आहे.
पाच कसोटी सामन्यांची मालिका चालू होत असताना खूप उत्साह असतो. फरक इतकाच आहे, की भारतीय फॅन्स विराट कोहली किंवा रोहित शर्मासाठी मैदानाकडे पळत सुटणार नाहीत तर जसप्रीत बुमरा समोरच्या फलंदाजांना काय प्रश्न विचारतो हे बघायला जाणार आहे. चित्र स्पष्ट आहे, की इंग्लंडची फलंदाजी चांगलीच तगडी आहे. त्याच्यासमोर भारताची गोलंदाजी धारदार वाटते आहे आणि भारताची फलंदाजी अनुभवता थोडी कमी आहे तशीच इंग्लंडची गोलंदाजी अनुभवात कमी आहे.
शुभमन गिल ११ जणांच्या संघात कोणाला घेतो हे बघायला लागणार आहे. साई सुदर्शनला पदार्पणाची संधी मिळेल, असे वाटते. मुख्य प्रश्न दोन वेगवान गोलंदाजांच्या निवडीचा आहे. बुमरा आणि सिराजला साथ द्यायला प्रसिद्ध कृष्णाची बाजू जरा जास्त वजनदार दिसते आहे. तसेच शार्दूल ठाकूरला त्याच्या फलंदाजांना बाद करायच्या क्षमतेमुळे नितीशकुमार रेड्डीपेक्षा पसंती मिळायची शक्यता नाकारता येत नाही. इंग्लंडने तीन वेगवान गोलंदाजांसोबत शोएब बशीरची फिरकी असेल आणि त्याला अष्टपैलू बेन स्टोक्सची साथ असेल.
कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी नाणेफेक झाल्यावर गोलंदाजी येवो वा फलंदाजी, कोणता संघ नव्या चेंडूवर कसा खेळ करतो, यावरच सामन्याची लय ठरणार आहे. उपाहारापर्यंत तग धरला तर पहिले दोन दिवस फलंदाजीसाठी चांगले असतील. कसोटी कप्तान म्हणून पहिल्यांदा मैदानात नाणेफेकीला उतरणाऱ्या शुभमन गिलला नशिबाची साथ कशी मिळते आणि तो काय धाडसी निर्णय घेतो, हे बघणे मजेदार ठरणार आहे.