RCB च्या IPL 2025 विजय उत्सवादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत ११ जण ठार झाले.
चिन्नास्वामी स्टेडियमजवळ रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) च्या IPL 2025 विजय सोहळ्यादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत ११ जण ठार, तर ३३ जखमी झाले. विजयी परेडबाबतचा गोंधळ, मोफत पासेस, प्रचंड गर्दी आणि मर्यादित जागा ही दुर्घटनेची प्रमुख कारणं असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
पोलिस सूत्रांनुसार, ज्यांच्याकडे प्रवेश तिकीट नव्हतं अशा क्रिकेटप्रेमींनी तिकीटधारकांसह स्टेडियममध्ये घुसण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे गोंधळ वाढला आणि चेंगटली झाली. काही जण जमिनीवर पडले, तर काहींना उंच गेट्स चढताना दुखापत झाली. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितलं की, स्टेडियमची क्षमता ३५,००० आहे, पण २-३ लाख लोक जमले. “काल सामना झाला आणि आज हा कार्यक्रम क्रिकेट असोसिएशनने आयोजित केला. एवढी गर्दी येईल, असं कोणालाच वाटलं नव्हतं,” ते म्हणाले.
सिद्धरामय्या यांनी स्पष्ट केलं, “लहान गेट्समुळे लोकांनी गेट्स तोडली आणि चेंगटली झाली. चौकशीत तथ्य समोर येईल.” बेंगळुरु वाहतूक पोलिसांनी सकाळी ११:५६ वाजता विजयी परेड नसून केवळ सत्कार समारंभ होईल, असं जाहीर केलं होतं. मात्र, RCB व्यवस्थापनाने दुपारी ३:१४ वाजता X वर पोस्ट केलं की, संध्याकाळी ५ वाजता विजयी परेड होईल, आणि मोफत पासेस (मर्यादित प्रवेश) असेल.” यामुळे चाहत्यांमध्ये गोंधळ वाढला.
पोलिसांनी स्पष्ट केलं होतं की, केवळ वैध तिकीटधारकांनाच प्रवेश मिळेल, तरीही हजारो चाहते स्टेडियमबाहेर जमले आणि काहींनी गेट्स उडी मारून प्रवेशाचा प्रयत्न केला. एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितलं, “तिकीटधारक आणि मोफत पासधारक एकत्र घुसण्याचा प्रयत्न करत होते, ज्यामुळे ढकलाढकली झाली.” पोलिसांना गर्दी नियंत्रित करण्यासाठी सौम्य बळाचा वापर करावा लागला, आणि काही ठिकाणी लाठ्यांचा वापरही झाला.
सिद्धरामय्या म्हणाले, “विद्या सौधासमोर १ लाखांहून अधिक लोक जमले, पण तिथं काही झालं नाही. स्टेडियमवर मात्र ही दुर्घटना घडली. क्रिकेट असोसिएशन किंवा सरकारला याची अपेक्षा नव्हती.” गर्दीमुळे बेंगळुरु मेट्रोने कब्बन पार्क आणि डॉ. बी. आर. आंबेडकर स्थानकांवर गाड्या न थांबवण्याचा निर्णय घेतला.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter